युक्रेन मधील भारतीय विद्यार्थी : विदूषक जिवंत आहे.



सध्या सगळे जग रशिया विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ उभे आहे. विशेषतः युक्रेनचे विदूषक राष्ट्रपती व्होल्डोमेर झेलेन्स्की यांच्या प्रेमात तर अनेक भारतीय पण पडले आहेत. आता एक विदूषक राष्ट्रपती बनू शकतो आणि जगात नाव कमवू शकतो हे बघितल्यावर एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना उचंबळून येणार त्यात त्यांचा दोष नाही. मात्र आता युक्रेनवरून मोठ्या प्रमाणावर येणारे विद्यार्थी आणि त्यांना युक्रेनच्या पोलीस आणि सैन्याकडून आलेले अनुभव पाहता, युक्रेन जितका वाटतो तितका सरळ नाहीये. 

युक्रेन मधून बाहेर निघायचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी विदयार्थ्यांची युक्रेनच्या सीमेअंतर्गत अडवणूक करण्याचा प्रकार आणि त्या साठी वेळप्रसंगी बळाचा वापर युक्रेन करत आहे. पहिले असा समज झाला होता की युक्रेनी नागरिकांना भारताने घेतलेल्या भूमिकेबद्दल राग आला त्यामुळे विद्यार्थ्यांना हे त्रास देत आहे. मात्र जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे. अर्थात कितीही बाका प्रसंग आला तरी पोलीस आणि सेना सरकारी हुकुमाचे ताबेदार असतात. याच दृष्टीने विचार केला तर जागतिक वाहवाही मिळणारे विदूषक राष्ट्रपती एकतर युक्रेनी सेना-पोलीस आणि मिलीशीयावर कोणत्याही पद्धतीने आपला आदेश लागू करू शकत नाहीये किंवा भारतीय आणि अन्य विदेशी नागरिक / विद्यार्थ्यांना त्रास द्यावा, त्यांना युक्रेनच्या सीमेतच अडकवून ठेवावे या धोरणावर काम करत आहे. 



खाराकीव्ह : युक्रेन मधील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे शहर आणि युक्रेन मधील दुसऱ्या क्रमांकाची महानगर पालिका. युक्रेनच्या स्वातंत्र्यानंतर या शहराला अधिक महत्व प्राप्त झाले. तसेही सोवियत काळापासून हे शहर उद्योग प्रधान शहर म्हणून नावारूपास आले होते. गेल्या काही वर्षात खाराकीव्ह युक्रेनचे आर्थिक जनरेटर म्हणून समोर आलेले शहर. खास करून २०१४ ला जेव्हा रशियाने क्रिमियावर कब्जा केला, त्या नंतर खाराकीव्ह शहराचे महत्व अजून वाढले. क्रिमियातून बाहेर निघालेले युक्रेनियन उद्योगी आणि आय. टी. उद्योगांनी पहिली पसंद हेच खाराकीव्ह शहर होते. याच आय. टी. उद्योगाच्या भरवश्यावर शहराच्या प्रगतीत भर पडली होती.



युक्रेनच्या उत्तर पूर्व भागात रशियाच्या निकोटिव्हा या शहरापासून अवघ्या ४०- ५० किलोमीटर अंतरावर असलेले हे शहर. रशियन हल्ला झाला तर या शहराला ताब्यात घ्यायचा प्रयत्न रशिया सर्वशक्तीनिशी करणार हे जगजाहीर होते. त्या नुसार युक्रेननेपण शहराच्या संरक्षणाची तयारी केलीच असणार. मात्र रशियन आक्रमणा समोर ती तयारी धारशाही पडली. काहीशी अशीच अवस्था राजधानी किव्ह आणि दक्षिणी शहर ओडेशाची आहे. रशियन सैन्य गेल्या काही दिवसात खाराकीव्ह आणि ओडेशा शहरात उपस्थित आहे. मात्र युक्रेनियन सैन्याच्या अधून मधून होणाऱ्या हल्ल्यांना ते तोंड देत होते. शेवटी गेल्या दोन दिवसात रशियाने पूर्ण शक्तीनिशी खाराकीव्ह वर आक्रमण करत त्या शहराचा पडाव केल्याचा दावा केला आहे. खाराकीव्हवर केलेला प्रहार इतका जोरदार होता की, खाराकीव्ह शहर पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याच्या बातम्या येत आहे. हे तेच शहर आहे ज्या शहरात भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पाचा बळी गेला. आज त्याच्या बळीचा आधार घेत भारत सरकारवर शरसंधान करणारे या शहराबाबत कितपत माहिती ठेऊन आहेत? रशियन हल्ल्याच्या पहिल्या क्षणापासून खाराकीव्ह शहर हे रशियन माराच्या टप्प्यात आहे, अगदी राजधानी किव्ह पेक्षा जास्त. अश्या शहरात राहणारे विद्यार्थी १३ ते १५ तारखेपासून भारतीय दूतावास युक्रेन सोडण्याच्या आवाहना कडे दुर्लक्ष करत राहिले होते. इतकेच नाही तर २४ तारखेला हल्ला सुरू झाल्यानंतर पण त्याच शहरात बसून राहिले ते का?


 नागपुरात वापस आलेल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार युक्रेनियन विश्वविद्यालय युद्धा विषयी योग्य माहिती देत नव्हते. सोबतच वर्गात उपस्थित राहण्याची सक्ती अगदी २६ तारखे पर्यंत करत होते. ही माहिती खरी असेल तर या विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाला खऱ्या अर्थाने युक्रेनचा विदूषक राष्ट्रपती जवाबदार नाही का? सध्या तरी सगळ्या जगाने या विदूषकाला डोक्यावर घेतले असले तरी, विदेशी विद्यार्थ्यांना वेठीला धरून याने आपले राजकारण चमकवायचा पूर्ण प्रयत्न केला हे खरे आहे. मागे राहिलेले भारतीय विद्यार्थ्यांनीपण आपल्या देशाच्या दूतावसाने एकण्यापेक्षा या विदूषकाचे ऐकले हे दुर्दैव.



बाकी एकदा युद्धाची धामधूम सुरू झाली की त्या वेळी कोणाला काहीही सुविधा मिळू शकत नाही याची माहिती तरी या विद्यार्थ्यांना असायला हवी होती.

बाकी या आरोपप्रत्यारोपाच्या वावटळीत एक गोष्ट मात्र हमखास नजरेआड केली जात आहे. ती म्हणजे युक्रेनची राजधानी किव्ह येथील बहुतांश दूतावास बंद झाले आहेत. अमेरिका, ब्रिटन, चीन, जर्मनी, कॅनडा या देशांनी एकतर दूतावास बंद करत युक्रेनच्या बाहेर काढले किंवा पश्चिम युक्रेनमधील साधारण शांत भागात नेले आहेत. आता ते आपल्या देशातील नागरिकांना कोणतीही मदत करत नाहीये. मात्र किव्ह मधील भारतीय दूतावास पूर्णपणे कार्यरत आहे. किमान किव्ह मधून तरी सगळ्या भारतीयांना बाहेर काढल्याचे काल जाहीर केले आहे.

खाराकीव्ह येथे रशियन सैन्याने भारतीय सरकारची विनंती मान्य करत भारतीय विद्यार्थ्यांसाठी तब्बल सहा तासांचा "सेफ पॅसेज" उपलब्ध करून दिला होता. मात्र या काळात पुरेसे भारतीय विद्यार्थी खाराकीव्ह मधून बाहेर पडू शकते नाहीत. रशियन सेनेने तर युक्रेनच्या सरकरवर सरळ सरळ भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप केला आहे. 

त्यात लक्षात घेण्यासारखे असे की निदान भारतीय नागरिकांसाठी भारत सरकार झटत आहे. आपली राजनैतिक ताकद, पैसा लावत आहे तरी ही अवस्था. मग ज्या देशांची या सगळ्याची ताकद नाही त्या देशांचे काय? 

नायजेरिया सारख्या गरीब आफ्रिकी देशातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल तर अधिकच द्रवीत करणारे आहेत. हे विद्यार्थी आता किव्ह वरून पाईच पोलंडकडे निघाले आहेत. मात्र युक्रेनचे सुरक्षा रक्षक त्यांना मारहाण करत आहेत. युक्रेनचे नागरिक त्यांच्या सोबत रंगभेदाची वागणूक देत आहेत. सध्या युक्रेनमध्ये प्रचंड थंडी आहे. रात्री तापमान कमालीचे खाली जाते. अश्या वेळेस ऊब ठेवण्यासाठी या विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे पेटवून ऊब घ्यावी लागत आहे. हे उदाहरण प्रातिनिधिक आहे. वंश, भाषा, रंग यावरून मोठ्या प्रमाणावर युक्रेनी नागरिक आणि सुरक्षा रक्षक भेदभाव करत आहेत. तरी अजून युक्रेनी नागरिकांच्या हातात पुरेशी शस्त्रे आली नाहीये. नाहीतर यांनी आपल्या देशात अडकलेल्या लोकांचे जीव घेत त्याचा आरोप रशियावर टाकला असता. 

बाकी या सगळ्याचा उद्देश इतकाच की, युक्रेन वाटतो तितका पण सरळ नाहीये. युक्रेनच्या बलशाली आणि धिराच्या राष्ट्रपतींच्या आतील विदूषक अजून जागा आहे.

टिप्पण्या